महालक्ष्मी दर्शनमार्ग सुलभ; मूळ योजनेतील बदलाला मुंबई हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल

मुंबईतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर व भोवतालच्या परिसरात इतर व सणासुदीच्या दिवसांत भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, अपुरी जागा व मंदिराकडे जाणारा एकमेव अरुंद मार्ग, ही परिस्थिती लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाच्या मूळ योजनेत विशिष्ट बदल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, त्याचवेळी ‘योजनेतील दुरुस्तीचा आणि संबंधित पुनर्विकासाचा उपयोग हा केवळ भाविकांकरिता उत्तम व सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी होईल. त्याचा व्यावसायिकीकरणासाठी वापर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी’, असे उच्च न्यायालयाने श्री महालक्ष्मी टेम्पल ट्रस्टला बजावले आहे.

ट्रस्टतर्फे अध्यक्ष विजय गुपचुप यांच्यासह अन्य विश्वस्तांनी या संदर्भात अर्ज करून योजनेतील बदलाला मंजुरी मिळण्याच्या आवश्यकतेबाबत ज्येष्ठ वकील एस. एम. गोरवाडकर यांच्यामार्फत युक्तिवाद मांडला. त्यानंतर न्या. जितेंद्र जैन यांनी धर्मादाय आयुक्तांना ट्रस्टने प्रस्तावित केलेल्या सुधारणांचा विचार करून आपला अभिप्राय व सूचना देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे धर्मादाय आयुक्तांनी सरकारी वकील हिमांशु टक्के यांच्यामार्फत सीलबंद लिफाफ्यात आपल्या सूचना दिल्या. त्यानंतर त्या सूचना मान्य असल्याचे ट्रस्टनेही स्पष्ट केले. त्या अनुषंगाने न्यायमूर्तींनी ट्रस्टची विनंती मान्य केली.

श्री महालक्ष्मी, श्री महाकाली व श्री महासरस्वती यांच्या मूर्ती असलेल्या या पुरातन मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली, याची निश्चित माहिती नाही. तरी सन १७७१ ते १९८४ या दरम्यान स्थापना झाल्याचा अंदाज आहे. मंदिराच्या अव्यवस्थापन व अनियमिततांबाबत काही भाविकांनी तक्रार केल्यानंतर उच्च न्यायालयाने १० डिसेंबर १९१४ रोजी व्यवस्थापनाविषयी योजना निश्चित करून दिली. त्या योजनेत नंतर न्यायालयाच्या परवानगीने काही वेळा बदल झाले होते. यापूर्वीचा शेवटचा बदल सन १९७७मध्ये झाला होता. मात्र, ‘सद्यस्थितीत मंदिर व भोवतालचा परिसर हा प्रचंड संख्येत वाढलेल्या भाविकांना अपुरा पडत आहे. शिवाय अतिक्रमणे, झोपड्या, फेरीवाले यांच्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

न्यायालयाने आदेशात काय म्हटले?
‘प्रस्तावित बदल ट्रस्टच्या मूळ उद्देशाला बाधा आणणारे नाहीत. काळानुरूप बदल आवश्यक आहे, यात शंका नाही. कारण आत्तापर्यंत परिस्थितीत खूप मोठे बदल झाले आहेत. ज्या अरबी समुद्राचे पाणी कधी काळी मंदिराच्या परिसराला स्पर्श करायचे, तिथे आता सागर किनारी मार्ग तयार झाला आहे. हे मंदिराच्या आसपास होणाऱ्या बदलांचा वेग दर्शवते. त्यामुळे आजच्या अनिश्चित जगात मन:शांती मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काळानुसार ट्रस्टने स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे’, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी आदेशात नोंदवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *