सुट्टी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचा क्षण. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना खेळता येतं, फिरता येतं,राहिलेला गृहपाठ पूर्ण करता येतो. त्यामुळे सुट्टी विद्यार्थ्यांना केव्हाही आवडते. डिसेंबरमध्ये ख्रिसमससह अनेक सुट्ट्या आहेत. दरम्यान काही शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कोणत्या आहेत या शाळा? सविस्तर जाणून घेऊया.
शाळांना सुट्ट्या देण्याचा निर्णय
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील प्रशासनाने हिवाळ्यातील वाढत्या थंडी आणि दाट धुक्यामुळे छोट्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकारी संजय चौहान यांच्या सूचनेनुसार शाळांना हे निर्देश देण्यात आले आहेत. मूलभूत शिक्षण अधिकारी संजय तिवारी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश काढला. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
का घेण्यात आला निर्णय?
सकाळच्या वेळी दाट धुके आणि कडाक्याची थंडी असते. यामुळे मुलांना शाळेत येण्या-जाण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी आणि मुलांचे आरोग्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे पालकांनाही दिलासा मिळालाय.
कोणत्या शाळा आणि वर्गांना लागू?
हा आदेश अमेठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळांना लागू आहे. यात सरकारी शाळा, खासगी शाळा, मान्यता प्राप्त शाळा, अनुदानित शाळा तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि इतर बोर्डांच्या शाळांचा समावेश आहे. फक्त नर्सरी ते आठवी इयत्ता पर्यंतचे विद्यार्थी यांना हे निर्देश लागू आहेत. म्हणजे बालवाडीपासून ते आठवीपर्यंतची मुले 3 दिवस घरी राहतील. उच्च वर्ग म्हणजे नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू राहतील. हा नियम जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना बंधनकारक आहे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुट्टीच्या तारखा
विद्यार्थ्यांना ही सुट्टी 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या तीन दिवसांसाठी मिळणार आहे. या कालावधीत मुलांना शाळेत येण्याची गरज नाही आणि त्यांना पूर्ण विश्रांती घेता येईल. 25 डिसेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होतील.सध्याची हवामान परिस्थितीमुळे हा कालावधी निवडण्यात आला आहे.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी नियम
विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना मात्र शाळेत हजर राहावे लागेल. त्यांना यू-डायस डेटा अपडेट करणे, अनुदानाचा योग्य वापर, निवडणूक संबंधित कामे आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम आणि ब्लॉक संसाधन केंद्रातील प्रशिक्षण सत्रे यथावत चालू राहतील. यामुळे शाळेचे कामकाज थांबणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेत स्पष्ट करण्यात आलंय.
आदेशाची अंमलबजावणी
मूलभूत शिक्षण अधिकारी यांनी सर्व शाळा व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना हा आदेश काटेकोरपणे पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा निर्णय फक्त अमेठी जिल्ह्यातील शाळांना लागू आहे आणि उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये वेगळे नियम असू शकतात. अशा प्रकारचे आदेश हिवाळ्यात अनेकदा येत असतात. यामुळे लहान मुलांचे संरक्षण होते, असे पालक सांगतात.
