सकाळी ११.३० ते बाराची वेळ. एका मोठ्या पाण्याच्या टाकीखाली लोखंडी पाइपला वेल्डिंग मारण्यात व्यस्त कामगार. कामाच्या शोधात यातले अनेकजण बिहार, उत्तर प्रदेश अशा दूरवरून नागपुरात आलेले. कुणाचे सहा महिन्यांआधीच लग्न झालेले तर कुणी दोन महिन्यांआधी ‘बाबा’ झालेले. यातले अजय पासवान (वय २७) हे दोन महिन्यांची मुलगी व पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होते. ‘थोड्याच वेळात काम संपवतो आणि जेवायला बसतो’ असे सांगत होते. परंतु, नशिबाला काही वेगळेच मान्य होते.
एक जोरदार आवाज झाला आणि क्षणार्धात दीड लाख लिटर पाणी असलेली टाकी त्यांच्या अंगावर कोसळली.
या अपघातात प्रकाश बुल्ला साहनी (गवसरा, मुजफ्फरपूर, बिहार), अन्वर अन्सारी, मुफ्तार अन्सारी गंभीर जखमी झाले. तर, किरकोळ जखमींमध्ये बाबुचंद प्रसाद मुन्नर प्रसाद (आसोगावा, कुशीनगर, उत्तरप्रदेश), जाकीर शहनवाज हुसेन (वय ४५ वर्षे, राजापूर, बिहार), इब्राहिम नयीम अन्सारी (गोपालगंज, बिहार), मयुरी तुरक (वय २३ वर्षे, नागपूर), विकास कुमार पप्पू साहनी (वय २४, मुजफ्फरपूर, बिहार), संतोष दुधनाथ गौतम (वय २६ वर्षे, गोरखपूर, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.
अजय पासवान यांच्यापासून काही अंतरावर काम करत असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी कामगाराने ही आपबीती सांगितली. अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा कंपनीत शुक्रवारी झालेल्या या अपघाताने चांगलीच खळबळ उडाली. यापूर्वी इतका मोठा अपघात या परिसरात झालेला नव्हता. त्यामुळे कामगारांसह शेजारील गावातील ग्रामस्थदेखील भयभीत झाल्याचे दिसून आले. मृत्यूमुखी पडलेले सर्व कामगार बिहारमधील गरीब कुटुंबातील होते. हजारो मैल दूर नागपुरात ते केवळ आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. आज त्यांच्या घरी केवळ त्यांचे पार्थिव पोहोचणार आहे.
‘साहब, हम कमाने आये थे, जान गँवाने नही’, असा आर्त टाहो जीव गमावलेल्या कामगारांच्या मित्रांनी फोडला. दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना उपचाराकरिता बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे आणल्याचे कळताच जखमी कामगारांच्या नातेवाइकांनी तेथे मोठी गर्दी केली होती.
घर झाले पोरके
नव्वद टक्के कामगार नागपूरच्या बाहेरील असून गेल्या काही महिन्यांपासून बुटीबोरीत राहात आहेत. महिनाभर कष्ट करायचे आणि पगार झाल्यावर त्यातला निम्मा पगार घरच्यांना पाठवायचा असा त्यांचा नित्यक्रम होता. मृतांपैकी कुणी घरचा एकुलती एक कमावणारी व्यक्ती होती. त्याच्या निधनाने आता घरचे सगळे आता पोरके झाले आहेत. घटनेची पार्श्वभूमी बघता मिहानमधील एम्स व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) डे-केअर वॉर्डमध्ये ५० रुग्णांची आपात्कालीन सोय होऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीकडून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत व योग्य मोबदला देण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.
भरती केले, उपचार थांबवले
मेडिकलमध्ये भरती करण्यात आलेल्या दोन जखमी कामगारांवर बराच वेळपर्यंत उपचार करण्यात आले नाहीत, असा दावा कामगारांनी केला आहे. दाखल करून घेतल्यानंतर जवळपास सहा तास या कामगारांवर पुढील उपचार झाले नव्हते. विकास कुमार पप्पू साहनी (वय २४, मुजफ्फरपूर, बिहार), संतोष दुधनाथ गौतम (वय २६, गोरखपूर, उत्तर प्रदेश) अशी या कामगारांची नावे आहेत. यापैकी संतोष गौतम यांना डोक्याच्या दोन्ही बाजूंना दुखापत असून पार्श्वभागात जखम आहे. उजव्या मांडीच्या हाडाला (फेमर शाफ्ट) फॅक्चर झाले आहे. तर विकास साहनी यांना डोक्याच्या डाव्या कपाळाच्या भागात जखम, छातीच्या डाव्या बाजूला तसेच उजव्या गुडघा व कोपराला दुखापत झाली आहे. या दोघांनाही केवळ वेदनाशामक देऊन आणि सलाइन लावून ठेवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरने येऊन त्यांची साधी तपासणीदेखील केली नाही. या प्रकारावर जखमींच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली.
