शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसापासून जामनेर येथील एक 27 वर्षीय तरुण घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मोबाईल बंद होता. फोन लागत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. अखेर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आणि बेपत्ता तरुणाचा शोध लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीने कुटुंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. तरुणाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय 27) हा तरुण 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळला नाही. त्यानंतर तपासादरम्यान रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी आढळली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक पाठवून गुजरात राज्यातून भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी जुन्या किरकोळ वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. निलेशला मारून पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलामध्ये असलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह टाकून दिला, अशी माहितीही आरोपींनी दिली.
संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळी 10 वाजेच्या सुमारास रामदेववाडी येथील घनदाट जंगलात तलावातील पाण्यात निलेशचा मृतदेह आढळला.
