लग्नाच्या रात्रीच वधूला हवं ते मिळालं, मध्यरात्री पाठराखणीसह पळाली, नवरदेव तीन महिने थांबला पण गोळे मायलेकींनी…

लग्नानंतर पहिल्याच रात्री वधू आणि पाठराखणीने पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नववधूने नवरदेवाला तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. परभणीतील वधूसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ढवळी येथे हा प्रकार घडला. लग्नाच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार सांगलीसह राज्यभरात सुरुच असून त्यामुळे वरपक्षाची चिंता वाढली आहे.

नेमकं काय झालं?

लग्न लागलं. नवरदेव वधूसह वाजत गाजत आपल्या घरी आला. मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी, मध्यरात्री वधू आणि तिच्या पाठराखिणीने वराला अडीच लाख रुपयांचा गंडा घालून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या सोमनाथ चव्हाण या वराने वधूसह पाच जणांच्या विरोधात सांगली येथील तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वधू निकिता सखाराम गोळे, तिची आई शोभा सखाराम गोळे, वधूची मानलेली बहीण पूजा विजय माने, वधूची मावशी आणि परभणी येथील वधूवर सूचक केंद्राचे माणिकराव रंगनाथ पारधे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरदेव सोमनाथ चव्हाण यांचे भाऊ परभणी येथे ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची ओळख वधूवर सूचक केंद्राचे संचालक माणिकराव पारधे यांच्यासोबत झाली. त्यावेळी त्यांनी सोमनाथ यांच्या भावाला सोमनाथसाठी निकिताचे स्थळ सुचवले. त्यानुसार वधूसह सर्वजण 4 सप्टेंबर रोजी लग्नाची बोलणी करण्यासाठी तासगाव मधील ढवळी येथे आले.

लग्नाची बोलणी झाली, त्यावेळी निकिताची आई शोभा हिने लग्नासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. परंतु तडजोडी अंती अडीच लाख रुपये देऊन 5 सप्टेंबर रोजी लग्न करण्यात आले. लग्नाच्या दिवशी दुपारी वधू व तिची पाठराखीण सोमनाथ याच्या घरी थांबले व उर्वरित सर्वजण परभणीला परतले. तर त्याच मध्यरात्री वधू आणि तिच्या पाठराखणीने घरातून पलायन केले.

तीन महिने लोटले तरी निकिता घरी परत न आल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमनाथ याने आता तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार सुरूच असून आटपाडी तालुक्यातील दोन कुटुंबांना यापूर्वी पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. आता तासगाव मधील फसवणुकीचा प्रकार समोर आल्यामुळे लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *