नागपूरहून उड्डाण, पण पुण्याकडे येण्याऐवजी दुसऱ्याच शहरात लँड झाले विमान; प्रवाशांमध्ये उडाली खळबळ

मागील काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीच्या सेवेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून देशातील अनेक शहरांमध्ये कंपनीकडून विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संताप पसरला आहे. अशातच गुरुवारी रात्री नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांसोबत धक्कादायक प्रकार घडला. रात्री उशिरा इंडिगोच्या विमानाने नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान पुण्याला येण्याऐवजी थेट हैदराबादला पोहोचलं आणि मध्यरात्री या प्रवाशांना हैदराबाद विमानतळावर सोडण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी नागपूर-पुणे असे इंडिगोचे विमान होते. मात्र या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते पुण्याऐवजी हैदराबादला पोहोचलं. नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर पुणे विमानतळावर लँड करण्यासाठी तिथे जागा नसल्याची माहिती प्राप्त झाल्याने हे विमान हैदराबाद विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे.

प्रवाशांचा संताप

इंडिगोचे विमान पुण्याऐवजी हैदराबादला गेल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक जण आपल्या महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्याकडे निघाले असताना हैदराबादला उतरवण्यात आल्याने या प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसंच हैदराबादला पोहोचल्यानंतरही जवळपास तासभर या प्रवाशांना विमानातच बसवून ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर काही प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सर्वांना हैदराबाद विमानतळावर उतरवण्यात आलं.

कंपनीकडून स्पष्टीकरण मागितलं

उड्डाणांमध्ये होणारा प्रदीर्घ विलंब आणि ती रद्द होण्याचे प्रकरण डीजीसीएने गांभीर्याने घेतले असून याबाबत इंडिगो कंपनीकडून विस्तृत स्पष्टीकरण मागितलं आहे. ‘सद्यःस्थितीचा तपास करत आहोत, विमानाचे संचलन पूर्वपदावर आणण्यासाठीच्या उपायांवर विमान कंपनीशी चर्चा करत आहोत,’ असं डीजीसीएने म्हटलं आहे. इंडिगोमध्ये अलीकडच्या काळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. विमान उड्डाणस्थितीत असतानाच्या कर्तव्याची कालमर्यादा (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन – एफडीटीएल) निश्चित झाल्यानंतर व त्यासंदर्भातील नियम लागू झाल्यानंतरच या विमान कंपनीला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. नव्या नियमांतर्गत वैमानिकांचा साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. रात्रकालीन विमान उतरवण्याची संख्याही मर्यादित करण्यात आली आहे. या गोंधळाबाबत इंडिगोने गुरुवारी कोणतेही निवेदन जारी केले नसले तरी, गेल्या दोन दिवसांपासून संचलनातील अनेक अनपेक्षित आव्हानांमुळे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे, असे कंपनीने बुधवारी स्पष्ट केले होते. शिवाय प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफीही मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *