येरवडा परिसरात एका महिलेला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी तब्बल २७ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. मनी लाँड्रिंगमध्ये बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाचा वापर झाल्याची भीती दाखवून, तपासात सहकार्य न केल्यास कारवाईची धमकी देत या चोरट्यांनी महिलेला फसवले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ही फसवणूक ५ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली.
सायबर चोरट्यांनी रितेश राव आणि शिवा सर अशी नावे सांगून महिलेशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. महिलेच्या मोबाइल नंबर आणि बँक खात्यांवरून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाल्याची माहिती देऊन त्यांनी महिलेला घाबरवले. या प्रकरणी तपासात मदत करावी लागेल, असे बजावत त्यांनी महिलेला विश्वासात घेतले.
तपासात मदत करण्याच्या बहाण्याने आणि केस क्लिअर करण्यासाठी महिलेकडील पैसे तात्पुरते त्यांच्याकडे जमा करावे लागतील, असे सांगून आरोपींनी महिलेला विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. यावर विश्वास ठेवून महिलेने २७ लाख ५० हजार रुपये पाठवले. तपास पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र, पैसे परत न मिळाल्याने महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या घटनेमुळे सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि नागरिकांची होणारी फसवणूक पुन्हा एकदा समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
