धावत्या रिक्षात चालक निपचित पडला, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी धाव घेताच…; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

कोल्हापुरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे भाजी मंडईपासून विक्रेत्यांपर्यंत भाजी पोहोचवत असतानाच अचानक स्वतःच्याच रिक्षात त्यांच्यावर काळाने घाला घातला. रिक्षा चालवत असताना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने रिक्षा चालकाने आपले प्राण सोडले आहेत. कोल्हापूर शहरातील कळंबा परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास चाबूक-पाटील हे गेल्या 30-35 वर्षांपासून रिक्षाचालक म्हणून काम करत आहेत. रिक्षा चालवून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय ते करीत होते. विलास दररोज पहाटे कोल्हापूर मार्केट यार्ड येथे जाऊन विक्रेत्यांकडून भाजी घेत असत. पुढे ती भाजी शहरातील विविध ठिकाणी जाऊन रिक्षातून ते भाजी वितरीत करत असत. हा असा त्यांचा रोजचा दिनक्रमच होता. मात्र बुधवारी सकाळी त्यांच्याबाबत असं काही घडलं की क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

नेमकं काय घडलं?
बुधवारी, 26 नोव्हेंबर रोजी सुमारे पहाटे चार वाजता विलास हे घरातून निघाले आणि मार्केट यार्डमध्ये त्यांनी भाजी घेतली आणि नंतर कसबा बावडा, कळंबा येथे भाजी पोहोचवली होती. त्यानंतर पाडळकर मार्केटकडे जात असताना कळंबा कारागृहाजवळ त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले . त्यामुळे लगेचच त्यांनी रिक्षा रस्त्याकडे थांबवली. रिक्षामध्येच असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी हे पाहिल्यानंतर तातडीने 108 रुग्णवाहिका बोलवून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पुढे बेशुद्ध अवस्थेतच त्यांना सीपीआर येथे पाठवण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, विलास चाबूक-पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, आणि नातवंडांच्या परिवाराचा असा असून, त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीय तसेच सहकारी रिक्षा चालक आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *