देसाई गावाकडून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह बॅगेत भरला. नंतर ही बॅग खाडी पुलावरून फेकून देण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा 24 तासांच्या आत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ही तरुणी आरोपीसोबत राहत होती. त्यांच्यातील भांडणानंतर त्याने तिची हत्या केल्याची बाब चौकशीत उघड झाली आहे.
देसाई खाडी पुलाखाली एका बॅगेत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारी शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ आणि अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहाचले. त्यावेळी मातीच्या भरावावर आढळून आलेल्या एका बॅगेत महिलेचा मृतदेह अर्धवट बाहेर आल्याच्या स्थितीत दिसून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.
पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली होती. याविषयीची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली होती. त्याद्वारे पोलिसांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण माहिती मिळाली. ही माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी देसाई परिसरातून विनोद विश्वकर्मा (50) याला ताब्यात घेतले.
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या विनोदसोबत मृत 22 वर्षांची तरुणी पाच वर्षांपासून राहत होती. 21 नोव्हेंबरला त्यांच्यात भांडण झाले. यातून विनोदने या तरुणीची गळा दाबून हत्या केली. नंतर तिचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून खाडी पुलावरून दिला.
