वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी या गावात एका दुर्दैवी घटनेत पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पत्नीने विहिरीत उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही जीव गेला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे.
अमोल किसन जगताप (४०) आणि सीमा अमोल जगताप (३५) या दाम्पत्यामध्ये मंगळवारी संध्याकाळी एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात पत्नी सीमाने शेजारच्या शेतातील विहिरीत उडी मारली. हे पाहून अमोलनेही क्षणाचाही विचार न करता पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. दुर्दैवाने, दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांनाही स्वतःला वाचवता आले नाही आणि ते विहिरीत बुडून मरण पावले.
रात्री उशिरापर्यंत अमोल आणि सीमा घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. रात्री सुमारे ११ वाजता विहिरीजवळ दोघांच्या चपला दिसल्या. यावरून काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
मंगरूळपीर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाशी संपर्क साधला. रात्रीच्या वेळी शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पहाटेच बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली.
