मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या सात महिन्यांत एप्रिल ते ऑक्टोबर २०२५मध्ये २२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पुणे विभागातील तिकीट तपासणी पथकाद्वारे दोन लाख ६७ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातून १५ कोटी ५७ लाख रुपये दंड वसूल केला. मध्य रेल्वेने पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागांत मिळून सुमारे १४१ कोटी रुपये दंड वसूल केला.
सणासुदीच्या काळात रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढते. त्याचाच फायदा घेऊन काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन विशेष तपासणी पथकाद्वारे कारवाई करते. यंदा फुकटे प्रवासी वाढल्याचे दिसले.
गेल्या वर्षी २०२४-२५मध्ये १२४ कोटी ३६ लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत फुकट्यांवरील दंडात्मक कारवाई १४१ कोटींवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०२५मध्ये दिवाळी आणि छटपूजेच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा योग्य किंवा वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या तीन लाख ७१ लाख प्रवाशांना पकडले.
मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. गेल्या सात महिन्यांत पुणे विभागात दोन लाख ६७ हजार प्रवाशांना पकडले आहे. त्यातून १५ कोटी ५७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक फुकटे
गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक फुकटे मुंबई विभागात सापडले आहेत. या विभागात नऊ लाख ५३ हजार लोकांवर कारवाई करून ४० कोटी ५९ लाख रुपये दंड वसूल केला आहे. भुसावळ विभागात सहा लाख जणांवरील कारवाईतून ५१ कोटी ७४ लाखांचा दंड वसूल केला आहे. पुणे विभागात दोन लाख ६७ हजार प्रकरणांतून १५ कोटी ५७ लाख, नागपूर विभागात दोन लाख ५३ हजार प्रकरणांमधून १५ कोटी ६२ कोटी रुपये, तर सोलापूर विभागात एक लाख ४१ हजार प्रकरणांमधून सहा कोटी ७२ लाख रुपये दंड वसूल केला आहे
रेल्वेतून प्रवास करताना नागरिकांनी तिकीट काढून प्रवास करणे आवश्यक आहे. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास रेल्वे नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते; शिवाय गुन्हाही दाखल होऊ शकतो.
