उरण तालुक्यातील मोठे भोम गावात 9 नोव्हेंबर रोजी 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांची क्रूर हत्या करण्यात आली. उरण पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली असून हिराबाईंचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांना बेदम मारहाण करून ठार मारण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या लाकडी पट्ट्या सापडल्या असून, शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्या आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
उरण पोलिसांच्या तपासात हिराबाई जोशी यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. 9 नोव्हेंबर रोजी मोठे भोम गावात हिराबाई जनार्दन जोशी मृतावस्थेत आढळल्या होत्या. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालं आहे की, हिराबाईंचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल होती. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार, हिराबाईंच्या शरीरावर टणक वस्तूने मारहाणीच्या अनेक गंभीर जखमा होत्या. डोक्यापासून छातीपर्यंत, तसेच हात-पायांवरही मारहाणीच्या खुणा आढळल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या दोन तुटलेल्या लाकडी पट्ट्या सापडल्या. यावरून हत्येची क्रूरता स्पष्ट झाली आहे.
जमीन व्यवहारातून मिळाले होते पैसे
प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती उरण पोलिसांच्या हाती लागली आहे. हिराबाई यांनी नुकत्याच विकलेल्या चार गुंठे जमिनीतून त्यांना 15 लाख रुपये मिळाले होते. यातील पाच ते सहा लाख रुपये त्यांनी आपल्या नातेवाइकांना दिले होते. पैशांच्या वाटपावरून झालेल्या वादामुळेच ही हत्या झाली असावी, अशी शक्यता अधिक बळावली आहे. उरण पोलीस या दिशेने सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे उरण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी आरोपींचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून, तातडीने आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
