‘टीईटी’ पेपरफुटीमागील टोळी पकडली; कोल्हापुरात सात अटकेत; विद्यार्थ्यांकडून SIT चौकशीची जोरदार मागणी

राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’चा पेपर फोडण्यासाठी सज्ज असलेल्या एका मोठ्या टोळीला पोलिसांनी पकडले. या टोळीतील सात जणांना अटक केली असून दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही शिक्षकही असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड परिसरात हा प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला.

शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा राज्य सरकारने सक्तीची केली आहे. त्यानुसार रविवारी ही परीक्षा झाली; पण या परीक्षेतील पेपर आधीच देतो असे सांगून जिल्ह्यात एक टोळी कार्यरत झाली होती. या टोळीमध्ये दत्तात्रय चौगुले आणि गुरुनाथ चौगुले या राधानगरीतील दोघांचा समावेश होता. त्यांच्यासह अनेक जण या टोळीत सहभागी होऊन शिक्षकांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. काहींनी तर कोरे धनादेश दिले.

रविवारी सकाळी पेपर होता शनिवारी रात्रीच या सगळ्यांना पेपर देण्यासंदर्भात शब्द देण्यात आला. त्यानुसार कागल तालुक्यातील सोनगे येथे अनेकांना बोलवण्यात आले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि सोनगे येथील एका फर्निचर मॉलवर छापा टाकला. तेथे महेश भगवान गायकवाड हा पेपर आणून देणार होता. अनेक एजंट यामध्ये कार्यरत होते. याची व्याप्ती मोठी असल्यामुळे प्रथम सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

पर फोडण्याची सर्व प्रक्रिया त्यांनी केली होती; पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी या टोळीचा इरादा उद्धवस्त केला. मुरगुड पोलिस व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. याशिवाय दहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे, कोरे धनादेश याशिवाय इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काहींचा समावेश असल्याची शक्यता आहे. यामुळे पोलिस या अनुषंगाने तपास करीत आहेत.

परीक्षा परिषद काय म्हणाली?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाशी परिषदेचा कोणताही संबंध नाही. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाही. ही पोलिसांची कारवाई आहे. ही कारवाई झाल्यानंतर आम्ही तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली तेव्हा या घटनेत कोणताही पेपर आढळून आला नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळे टीईटी परीक्षेचा कोणताही पेपर फुटलेला नाही.”

विद्यार्थी संघटनांकडून चौकशीची मागणी –
दरम्यान, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी एसआयटी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी केली आहे. टीईटीच्या पेपर दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी झालेल्या घटनांमुळे परीक्षा पद्धतीवरील विश्वासार्हता कमी झाली आहे. परीक्षार्थींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही परीक्षा परिषदेकडे चौकशीची मागणी केली आहे.”

पेपरची गोपनीयता कशी राखली जाते?
परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेच्या पेपरची गोपनीयता कशी राखली जाते याबद्दलही माहिती दिली. डॉ. बेडसे म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिक्षक पात्रता परीक्षेची पेपर छपाई खूप गोपनीय असते. सुरुवातीला पेपरच्या काही दिवस अगोदर परीक्षेचे पेपर जिल्हा कोषागारात गोपनीय पद्धतीने आणले जातात. तिथे २४ तास कडक पहारा असतो. त्यानंतर ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी सकाली झोनल अधिकारी, व्हिडिओ ग्राफीमध्ये ते पेपर परीक्षा केंद्रांवर पाठवतात. यामुळे कोणतीही टीईटी परीक्षेत कोणतीही पेपरफुटी झाली नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *