दिवसेंदिवस शिरुरपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढत आहे. अहिल्यानगरचा जवळच असलेल्या खारेकर्जुने गावातील पाच वर्षीय मुलीला बिबट्याने हल्ला केला आहे. शेकोटीजवळ खेळत असताना बिबट्याने चिमुकलीवर हल्ला करुन तिला उचलून नेलं आणि तेही तिच्या कुटुंबासमोर…रियांका पवार असं ह्या पाच वर्षीय मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे खारेकर्जुने परिसरात शोककळा पसरली आहे. रात्रीपासून वन विभाग पोलीस आणि ग्रामस्थांकडून बिबट्याने नेलेल्या मुलीचा शोध घेतला जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून खारेकर्जुने गाव आणि परिसरामध्ये बिबट्याची प्रचंड दहशत असल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. वन विभागाकडे वारंवार सांगूनही बिबट्यांना पकडण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. त्यातच रात्री दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास थंडी वाढली होती. त्यामुळे काहीजण शेकोटी पेटवून त्याच्या भोवती अंग शेकत बसले होते. रियांकादेखील त्यांच्या जवळच खेळत होती. अशातच शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि क्षणात त्या चिमुकलीला उचलून पळून गेला.
या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत पाठलाग केला पण बिबट्या त्या चिमुकलीला घेऊन पळून गेला. काही क्षणांतच बातमी गावात पसरली आणि बिबट्या शोधात गावकरी लागले. नागरिकांनी एकत्र येऊन शोध मोहीम सुरू केली, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनीही शोध घेतला पण रात्रीच्या अंधारात शोध मोहीम कठीण झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावावर भीतीचं सावट पसरलंय.
धक्कादायक म्हणजे मंगळवारीच कामरंगाव इथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला. यावरून गावात बिबट्याचा वावर आहे, लक्षात आलं होतं. त्याच्यानंतर अवघ्या 24 तासांतच पुन्हा बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला. त्यामुळे या भयावह घटना घडल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
