दोन आठवड्यांचा पावसाळा संपला अन् उन्हाळा सुरु, गर्मीमुळे मुंबईकर हैराण; पण 20 राज्यांना हाय अलर्ट

गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता काहीशी उसंत घेतली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले, तर शेती, रस्ते आणि घरांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः पालघर, नाशिक, पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागांत उष्ण व दमट वातावरण जाणवू लागले असून मुंबईकरांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. +दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी देशातील सुमारे २० राज्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी पुढील २४ तासांत जोरदार पावसासह ताशी ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच कामासाठी बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमारांनीही समुद्रात जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ भागांत भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात सध्याची स्थिती

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. आज राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट कायम असून पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात अधूनमधून पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दोन ते तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शकतो.

कोकणात पावसाचा जोर ओसरला

गेल्या आठवड्यात कोकणात मुसळधार पावसाने मोठा कहर केला होता. मात्र आता परिस्थिती तुलनेने शांत झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. घाटमाथा परिसरात आधीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. इतर भागांत मात्र ढगाळ वातावरणासोबत अधूनमधून उन्हाचा तडाखाही जाणवू शकतो.

पश्चिम महाराष्ट्रात तुरळक सरी

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मात्र कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात उकाडा वाढण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली येथे हलक्या पावसाचा अंदाज असला तरी परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये पुढील काही दिवस कोरडे वातावरण राहू शकते. पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ होऊन उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात पावसाची प्रतीक्षा

अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाची शक्यता अत्यल्प आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक शेतकरी दुबार पेरणीच्या प्रतीक्षेत असून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत पावसाला ब्रेक, उकाड्याने नागरिक त्रस्त

मुंबईत गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारपासून शहर आणि उपनगरांत पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली असून नागरिकांना घामाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यंदा मुंबईत मान्सूनचे आगमन उशिरा झाले होते. त्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र जूनअखेर पावसाने जोर धरला आणि जुलैच्या पहिल्याच पाच दिवसांत शहरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सध्या कोकणासह राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला असून अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी ८.३० या २४ तासांत कुलाबा येथे ०.८ मिमी, तर सांताक्रूझ येथे ०.४ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण असले तरी दुपारनंतर उकाडा अधिक जाणवत होता. पुढील काही दिवसही मुंबईत दमट आणि उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *