मुंबईकरांना आणखी एक पर्यटनस्थळ मिळणार आहे. अलीकडेच मुंबई महापालिकेने मलबार हिल येथे नेचरवॉक उभारला आहे. मुंबईकरांना निसर्गाचा आनंद घेत पर्यटनांची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर याचधर्तीवर आता मुंबईकरांना आणखी एक पर्यटनस्थळ मिळणार आहे. बोरीवली येथे गोराई कांदळवन उभे राहत आहे. या कांदळवनाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या डिसेंबरमध्ये ते खुले होण्याची शक्यता आहे.
कांदळवन हा निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे. कांदळवनामुळं पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. तसंच, यामुळं समुद्र व खाडी किनाऱ्यावरील जैवविविधता टिकून आहे. कांदळवनाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गोराई खाडीत कांदळवन पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत साधारण 30 कोटी रुपये खर्चून या पार्कची निर्मिती सुरू आहे. वनविभागाच्या या प्रकल्पात 1 हाजर 600 चौरस किमी क्षेत्रात नेचर इंटरप्रिटेशन सेंटर दुमजली इमारत बांधण्यात येत आहे.
हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईत उन्नत मार्ग साकारण्यात येणार आहे. हा मार्ग लाकडी असून 700 मीटर लांबी आणि रुंदी 2.4 मीटर आहे. लाकडाचा वापर करुन कांदळवनामधून तयार केलेल्या बोर्डवॉकमधून परिसंस्था जवळून पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे एकही कांदळवन न तोडता हा बोर्डवॉक तयार करण्यात आला आहे.
इको टुरिजमला पर्याय
गोराईप्रमाणेच दहिसर मँग्रोव्ह पार्क हा दुसरा टप्पा असणार आहे. यामुळं उत्तर मुंबईच्या हरित विकासाला नवीन ओळख मिळणार आहे. मुंबईच्या इको-टुरिझम क्षेत्रातील पुढचा मोठा टप्पा ठरणार आहे. येथे एकाच ठिकाणी कांदळवनाचा विस्तीर्ण प्रदेश आणि महानगराची दाटी अनुभवता येणार आहे.
