वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जबरी धडक दिल्यामुळे कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबोरबर कारमधील चौथा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अल्लीपूर-धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ मंगळवारी (4 नोव्हेंबर) रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मृत युवकांचे नावे गौरव गावंडे (वय 32) निशांत वैद्य (वय 35) आणि वैभव शिवणकर (वय 28) अशी आहेत. तर भूषण वडनेरकर (वय 28) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव गावंडे हा मुंबईहून आपल्या गावी आला होता. त्याला घेण्यासाठी भूषण वडनेरकर कारने धोत्रा चौकात गेला. त्याच्यासोबत निशांत वैद्य आणि वैभव शिवणकर हेसुद्धा होते. तिथून निघून ते चौघे कारने अल्लीपूरच्या दिशेने रवाना झाले. परत येत असताना एकुर्ली फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
