रायगडमधील ‘या’ नदीवरील पूल मृत्यूचा सापळा की प्रशासनाचा निष्काळजीपणा; कधीही कोसळू शकतो?

कर्जत तालुक्यातील एका गावाजवळ उल्हास नदीवर उभारलेला पूल आज अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे. ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेला हा पूल आता धोकादायक अवस्थेत असून, त्याच्या खांबातील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत, काँक्रीट कोसळले आहे आणि पाया निखळत चालला आहे. दररोज या पुलावरून शेकडो लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

या पुलावरून बीड बु., मोहिली, मुगपे आणि चोची अशा गावांना जाणारी वाहतूक होते. हा पूल कोसळल्यास या चार गावांचा संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली, पण बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने केवळ फाइल हलवण्यातच रस दाखवला. मागील पाच वर्षांत केलेली ‘दुरुस्ती’ ही केवळ रंगरंगोटीपुरतीच ठरली आहे.

महापुरानंतर पुलावरील लोखंडी रेलिंग वाहून गेले, रस्त्याचा पृष्ठभाग खचला, पण अधिकाऱ्यांनी त्याकडे गंभीरतेने पाहिले नाही. अवजड ट्रक आणि टेम्पोची सततची वाहतूक पुलावरचा भार अधिक वाढवत आहे. “कोणत्याही क्षणी पूल कोसळू शकतो,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. “दररोज या पुलावरून मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटते. जर पूल वाहतुकीसाठी बंद केला, तर पर्यायी मार्ग १५ किलोमीटर लांब आहे. आम्हाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो,” असे एका ग्रामस्थाने सांगितले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. पूल जीर्ण झाल्याची माहिती असूनही विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी तक्रार देऊन “सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांची नोंद करा” अशी मागणी केली आहे. मोहिली पूल केवळ एका गावाचा नव्हे, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रतीक बनला आहे. रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा या केवळ निवडणुकीच्या वचनांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *