विवाहित तरुणीला संपवलं अन् बॉडी नदीत फेकली; मित्रानेच घटनाक्रम उलगडला, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (इस्लामपूर) इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका विवाहित मैत्रिणीचा तिच्याच मित्राने गळा आवळून खून केला. यानंतर आरोपीने मैत्रिणीचा मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिला आणि थेट पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा कबूल केला. आरोपी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळवा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित महिलेचा पती कर्नाटकात मजुरी करतो. सदर महिला खासगी रुग्णालय आणि खानावळीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. ईश्वरपूर येथील रुग्णालयात काम करत असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली. पीडितेच्या आईला रुग्णालयात दाखल केले होते, त्यावेळी या दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली.

या मैत्रीतून दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू झाली होती. काही काळापासून सदर तरुण आणि विवाहित महिला यांच्यात पैशांवरून सतत वाद होत होते. याच वादातून संशयित तरुणाने आपल्या मैत्रिणीचा खून केला. विशेष म्हणजे, तरुणाने स्वतः ईश्वरपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिली.

मंगळवारी सायंकाळनंतर पीडित महिला घरातून बाहेर पडली होती आणि रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. नातेवाईकांनी बुधवारी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर काही वेळातच संशयित तरुण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याचं सांगितलं. तसंच, मृतदेह ताकारी येथील कृष्णा नदीच्या पात्रात पोत्यात भरून फेकून दिल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस आणि नातेवाईक हादरले.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली. उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. या शोधमोहिमेत तरुणाची दुचाकी आढळून आली. मात्र अद्याप सदर महिलेचा मृतदेह आढळून आलेला नाही. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे वाळवा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *