हाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकवला आहे, तर हिमालय घोरपडे दुसरे आले आहेत. नाशिकमधील सिन्नर येथील रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
लहानशा गावातून सुरुवात
रवींद्र भाबड यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडी येथे झालं, तर माध्यमिक शिक्षण हे भोजपुर खुरे हायस्कूल येथे झालं, तर उच्च शिक्षण डी कॉलेज येथे झालेलं आहे. स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. याआधीही एमपीएससी परीक्षेत यश मिळाल्यानंतर रवींद्र भाबड यांनी संघर्षाची कहाणी सांगितली होती. गेल्या वर्षी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी बालपण आणि विद्यार्थीदशेतील काळ सांगितला होता.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले. पार्ट-टाईम काम, मित्रांची मदत, आणि स्वतःवरचा विश्वास यांच्या जोरावर ते पुढे गेले. “यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलायची नसते, दृष्टिकोन बदलायचा असतो” हा अवघ्या शब्दांचा विजयाचा मंत्र त्यांनी अंगिकारला.
दहा गुणांनी पोलीस भरती हुकली
आपण अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो असून आई-वडिलांनी मोल मजुरी करुन माझे आणि माझ्या दोन्ही बहिणींचे शिक्षण केल्याचे रवींद्र भाबड यांनी सांगितलं होतं. ‘एक-दोन वर्ष पोलीस भरतीची तयारी केली. साईड बाय साईड ग्रॅज्युएशनही सुरु होतं. 2014 च्या पोलीस भरतीमध्ये माझं सिलेक्शन दहा मार्कांनी राहिलं’ असंही भाबड यांनी सांगितलं.
मी एमपीएससीकडे वळायचं ठरवलं. पोलीस भरतीचं यश खरंतर समोर होतं. एखाद्या वर्षात पोलीस भरतीत यश मिळवून मी पोलीस शिपाई झालो असतो, चांगलं पगारपाणी भेटलं असतं, लग्न करून सेटल होता आलं असतं, पण तो मार्ग न निवडता मी जाणीवपूर्वक एमपीएससीचा खडतर मार्ग निवडला, असं भाबड म्हणाले.
पुणे गाठलं
2015 ला मी एमपीएससीच्या तयारीला सुरुवात केली, पहिले वर्षभर आमच्या नाशिक जिल्ह्यात तयारी केली. नाशिकनंतर एमपीएससीचं खरं वातावरण पुण्याला आहे, याची जाणीव असल्यामुळे पुण्याला एमपीएससीची पंढरीच म्हणतात. त्यामुळे मी तिकडे तयारीला शिफ्ट झालो आणि तीन चार वर्ष तीच तयारी केल्याचं भाबडनी सांगितलं.
सर्व परीक्षांची तयारी करणं ही एक खूप मोठी चूक ठरते, ही एक अपयशाला कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे, कारण आपण जर सर्वच परीक्षांची तयारी करायला गेलो, सर्वच दगडांवर हात ठेवायला गेलो तर मग एकाही गोष्टीत आपण सक्सेसफुल होत नाही, असं भाबड म्हणाले.
पहिल्या काही प्रयत्नांत MPSC मध्ये अपयश आले. पण त्यांनी निराश न होता, प्रत्येक वेळेस स्वतःचे विश्लेषण केले आणि सुधारणा केली. रवींद्र भाबड यांनी सांगितले, “अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असते.”
माझी गरीब परिस्थितीच माझं सर्वात मोठं बळ
ते सांगतात की गरिबी ही शाप नाही, ती शिक्षकासारखी असते — ती तुम्हाला वास्तव शिकवते. भाबड यांनी तरुणांना संदेश दिला — सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि अडचणींना मित्र बनवा. माझी गरीब परिस्थितीच माझं सर्वात मोठं बळ ठरलं, असं सांगायलाही रवींद्र भाबड विसरले नाहीत.
