मुंबईतील कफ परेड परिसरातील एका चाळीत सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि एका तासाच्या आत आग विझवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेड येथील मच्छिमार नगरमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत अचानक आग लागली. चाळीत आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आणि धावपळ सुरू झाली. आगीच्या धुरामुळे आणि ज्वालांमुळे जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावू लागले. काहींनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल जाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर एका तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे स्वरूप पाहता ती विद्युत वायरिंग आणि ईव्ही बॅटरीमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
