ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी

मुंबईला मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपलं असून, सोमवारी तर मुंबईत अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळी भरलेल्या शाळा लवकर सोडण्यात आल्या, तर दुपारच्या शाळा भरण्याआधीच बंद असतील असं कळवण्यात आलं. दरम्यान उद्याही अतिवृष्टीची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर उद्याही ठाण्यातील शाळा बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे.

ठाणे महापालिकेने एक्सवर पोस्ट शेअर करत उद्या ठाण्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद असतील असं जाहीर केलं आहे. “ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि..18 ऑगस्ट, 2025 आणि दि. 19 ऑगस्ट, 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे,” अशी माहिती एक्सवरुन देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट

ठाणे जिल्ह्यासाठी 19 ऑगस्ट 2025 रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने ​ठाणे जिल्ह्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट व 19 ऑगस्ट 2025 असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला असल्याची माहितीही पालिकेकडून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे कृपया टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असं आवाहनही करण्यात आलं आहे. तसंच आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी ​ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील ​1800-222-108/8657887101 या ​हेल्पलाईनवर कृपया संपर्क साधावा असंही सांगण्यात आलं आहे.

पुढील चार दिवस पावसाचे

हवामान खात्यानं मुंबई, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यभरात येत्या चार दिवसांपर्यंत पावसाचे सत्र सुरूच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणात रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज 18 ऑगस्ट रोजी ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

20 ऑगस्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

21 ऑगस्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जि्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

22 ऑगस्ट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जि्ह्यात काही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *