पंढरपुरात दर्शनासाठी आल्या, पण विठुरायाची भेट कायमची राहिली; एक चूक आणि तीन महिला भाविकांसोबत भयंकर घडलं

पंढरपूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. चंद्रभागेत स्नान करताना तीनही महिला बुडाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातील दोन आणि एका अनोळखी महिलेचा समावेश आहे. आज, शनिवारी सकाळी सात वाजता ही दुःखद घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?

जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या दोन महिला आणि एक अनोळखी महिला पुंडलिक मंदिराजवळ चंद्रभागेत स्नान करण्यासाठी उतरल्या होत्या. नदीत आंघोळीसाठी उतरल्या खऱ्या पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या. काही भाविकांच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. महिलांना वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने तीनही महिलांना वाचवता आलं नाही. सुनीता सपकाळ (वय ४३) आणि संगीता सपकाळे (वय ४०) या धावडा गावच्या रहिवासी आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनास्थळी आपत्कालीन व्यवस्था नसल्याची नागरिकांची तक्रार

या घटनेमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन घटनेसाठी एक बोट आणि काही कर्मचारी दिल्याचा गवगवा केला. पण वास्तविकपणे नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था अस्तित्वात नाही. असं चर्चा सर्वसामान्यांमध्ये होते आहे. प्रशासनाने सुविधा दिल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात कोणतीही मदत उपलब्ध नव्हती, असं बोललं जात आहे.
.. तर कदाचित महिलांचा जीव वाचला असता

आज सकाळी या महिला बुडाल्यानंतर नदीतील कोळी बांधवांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. प्रशासनाने तातडीने मदत न पुरवल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीत आपत्कालीन व्यवस्था असती, तर कदाचित या महिलांचा जीव वाचवता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *