मुंबईकरांचा प्रवास आता हायटेक होणार! ‘मुंबई 1’ कार्डवर आता एसटीचे तिकीट बुक करा

एसटीचे तिकीट काढण्यासाठी आता प्रवाशांना मुंबई वन कार्डचा वापर करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकिटिंग प्रणालीचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसोबत (एनसीएमसी) एकात्मीकरण (इंटिग्रेशन) करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई वन कार्ड हे मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आता यामध्ये लवकरच लालपरीचाही समावेश होणार आहे.

मेट्रो आणि लोकलप्रमाणे एसटीचे तिकीटदेखील यूपीआय व इतर संकेतस्थळांद्वारे ऑनलाइन काढता येते. याच पार्श्वभूमीवर आता महामंडळ डिजिटल पेमेंट्सला चालना देत असून, एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेनुसार एसटी महामंडळ आपल्या तिकिटिंग प्रणालीचे या प्रणालीसोबत एकत्रीकरण करणार आहे. यामुळे प्रवाशांना विविध वाहतूक सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज भासणार नाही. एकच कार्ड सर्वत्र चालणार असल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे.

एनसीएमसी कार्ड म्हणजे काय? 

केंद्र सरकारने सुरू केलेली एकसंध डिजिटल पेमेंट प्रणाली
एकाच कार्डवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येते
एनएफसी  तंत्रज्ञानावर आधारित
रिअल टाइम व ऑफलाइन व्यवहाराची सोय
रोख रकमेची गरज नाही, डिजिटल व्यवहाराला चालना

एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होत असली तरी महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलती अशा विविध योजनेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सोयीस्कर व्हावे आणि प्रवासी संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांना आकर्षक सवलती देण्याचा विचार करत आहे.

राज्यात प्रथमच विठ्ठल भक्तांसाठी एसटीकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 40 भाविकांच्या ग्रुपने लालपरी बुक केल्यास त्यांना आषाढी यात्रेला स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात 5 हजार 200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. एसटीने यंदापासून थेट गावातून पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *