जळगाव तालुक्यातील मोहराळा या गावातून बेपत्ता व नंतर पाच दिवसानंतर विहिरीत मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून धक्कादायक माहिती पुढे आलीये. या गुन्ह्यात एका निलंबित पोलीस कर्मचारीचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडालीये.
तरुणास गावातीलच त्याच्या सख्या आत्याचे पती तथा निलंबित पोलीस कर्मचारी यांच्या सांगण्यावरून दोन अल्पवयीन मुलांनी अमली पदार्थ गांजाचे सेवन करून विहिरीत ढकलण्याची कबुली पोलिसांकडे दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी दोन अल्पवयीन सह एका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून सदर हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मोहराळा तालुका यावल या गावातील रहिवाशी साहिल शब्बीर तडवी वय 19 हा तरुण दिनांक 16 जून पासून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊन ही तो मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवण्यात आली होती. या दरम्यान शुक्रवार दिनांक 20 जून रोजी त्याचा मृतदेह हा मोहराळा गावाकडून वड्री गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेवा मधुकर चौधरी यांच्या शेत विहिरीत आढळून आला.
मृतदेह विहिरीत मिळाल्यानंतर मयत याचे कुटुंब व नातेवाईकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत गावातील निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या घरावर हल्ला चढवला व त्याच्या वाहनाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह गावात दाखल झाले व त्यांनी गावात शांतता प्रस्थापित करून चोख बंदोबस्त लावला.मृतदेह तेथून काढून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला. तर या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गावातील दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी बोलावले आणि त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आपण निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या सांगण्यावरून साहिल तडवी याला अमली पदार्थ गांजाचे सेवन केल्यानंतर त्याला विहिरीत ढकलून दिले व त्याचा मोबाईल एका विहिरीत टाकून दिला.
पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात समीर गफुर तडवी यांच्या फिर्यादीवरून निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब तडवी व दोन अल्पवयीन यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे पोलीस कर्मचारी वासुदेव मराठे करीत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.