सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 9 नवे रस्ते, 4000 कोटींचा खर्चा, कुठून कसं गाठता येणार नाशिक?

२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने, वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी रविवारी नागपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते.

या बैठकीत संभाजीनगर ते नाशिक, नागपूर ते नाशिक तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासासंदर्भात सखोल चर्चा झाली. या रस्त्यांसाठी निधी मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्यापूर्वी केंद्र सरकारकडून एकूण नऊ रस्ते विकसित केले जातील अशी माहिती दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या कामासाठी ४००० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. यासोबतच जळगाव जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते विस्तार अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रस्ते नेटवर्क वाढवण्याची विनंती करण्यात आली होती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आठ मुख्य रस्त्यांच्या विकासास मंजुरी देण्यात आली आहे.”

कोणते आहे विकसित केले जाणारे रोड?

– घोटी-पहिणे-त्र्यंबकेश्वर-जव्हार फाटा
– द्वारका सर्कल – सिन्नर IC 21 (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार
– नाशिक ते कसारा
– सावली विहीर IC 20 (समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)
– नाशिक ते धुळे
– त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
– शॅडो विहिर – मनमाड – मालेगाव
– घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
– शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. यासोबतच नाशिक ते त्र्यंबक रस्ता सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नाशिक व त्र्यंबकेश्वरदरम्यानचा रस्ता अधिक सक्षम केला जाणार असून काही ठिकाणी सहा लेन आणि काही ठिकाणी चार लेनचे रस्ते तयार करण्यात येतील. कुंभ मेळ्यापूर्वी हे पहिले टप्प्यातील काम पूर्ण केले जाईल, आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे पार पाडली जातील. द्वारका सर्कलचा मार्ग देखील दोन टप्प्यांत विकसित करण्यात येणार आहे. या बैठकीला गिरीश महाजन (कुंभ प्रभारी मंत्री), चंद्रशेखर बावनकुळे (राज्य भाजपा अध्यक्ष), तसेच विविध खात्यांचे मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *