त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; घरोघरी शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळं सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. तासाभराच्या पावसामुळे रस्त्यांच्या अक्षरक्षः नदी झालीये. यावेळी शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

पिंपळगाव गरुडेश्वर त्र्यंबकेश्वर रस्ता परिसरात मंगळवारी ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. काही भागांत तर शेतजमिनीची मातीही पाण्यासोबत वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाचे पाणी शेतात आणि रस्त्यांवर साचल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी वाहतूक व नागरिकांच्या हालचाली पूर्णपणे विस्कळीत झाल्या. प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा फटका बसलाय.. कुडाळ तालुक्यातील नारूर गावात हातेरी नदीच्या पुरात रस्ता वाहून गेलाय. यामुळे 50 ते 60 गावांचा संपर्क तुटलाय.. रस्ता वाहून गेल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी तातडीनं हा रस्ता मंजूर करावा अशी मागणी गावक-यांनी केलीये.

यंदा अंदाजित वेळेनुसारच मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिलीये.  सोलापूरमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मका, डाळिंब आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात 32 हजार 440 शेतक-यांच्या 21 हजार 989 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झालेय. त्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 64 कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ साडे 3 टक्के खरीप पेरणी पूर्ण झालीय.  अनेक भागात पेरणीनंतर पाऊस पडला नसल्यामुळे कापूस,सोयाबीन तसेच मका या पीकांवर परिणाम झालाय. पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे जमिनीत वाफसा तयार होण्यास मदत होतेय. आता शेतक-यांनी खरीपाच्या पेरणीला सुरूवात केलीय. शेतीशिवारात पेरणीची लगबग पाहायला  मिळतेय. शेतक-यांची सर्वाधिक पसंती सोयाबीनच्या पेरणीला आहे.

मुंबईत 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणा-या जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणा-या इतर तलावांतही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पुढच्या 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये आणि पुणे आणि नाशिकच्या घाट भागात पुढील 3-4 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *