फास्टॅगचा वार्षिक पास लाँच करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही घोषणा केली होती. 15 ऑगस्टपासून टोल नाक्यावरुन जाताना 3000 रुपयांचा घेता येणार आहे. 3000 रुपयांचा पास काढल्यानंतर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरुन 200 वेळा टोलनाक्यावरुन प्रवास करु शकता. फास्टॅगच्या या योजनेचा फायदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू या महत्त्वकांक्षी महामार्गावर होणार का? हा प्रश्न अनेकांकडून करण्यात येतोय. तर जाणून घेऊया सविस्तर.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू या महामार्गावर हा पास वापरता येणार नाहीये. म्हणजे वाहनधारकांना येथे टोल द्यावाच लागणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मार्गांसाठीदेखील पास लागू करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. पण या महामार्गांवर ही योजना का लागू होणार नाही, याचे कारण सविस्तर जाणून घेऊयात.
नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार फक्त राष्ट्रीय महामार्गच या योजनेचा भाग आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारित येतात. एमएसआरडीसी ही समृद्ध महामार्गासह या महामार्गाची देखरेख करते. त्यामुळं या महामार्गावर टोल द्यावाच लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गाची सुरुवात NH या अक्षरांनी होते. तर, राज्यमहामार्गाची सुरुवात MH MSH अशी होते. त्यामुळं एनएच असा महामार्गाचा नंबर असलेल्या महामार्गांवरच टोल पास वापरता येणार आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे जुना महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळं या महामार्गावरुन प्रवास केल्यानंतर तुम्हाला टोल पास वापरता येणार आहे. तर नवीन मुंबई-पुणे महामार्ग हा महाराष्ट्र सरकारने बांधला आहे. त्यामुळं येथे हा पास चालणार नाही.
जयंत पाटील यांनी काय ट्विट केलं आहे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी तीन हजार रुपयांच्या वार्षिक पासची घोषणा केली असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वरूनही मोठ्या प्रमाणावर दैनंदिन पातळीवर लोक प्रवास करतात. या प्रवासासाठी देखील वार्षिक पासची मोठी आवश्यकता आहे. म्हणूनच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी याच धर्तीवर पुणे- मुंबई एक्सप्रेसवे अटल सेतू सह) वार्षिक पासची घोषणा करून दैनंदिन प्रवाशांना दिलासा द्यावा.