नवी मुंबईतील एका पर्यटकाचा मुरबाडच्या सिद्धगड परिसरात दुर्दैवी मृत्यू झाला. साईराज चव्हाण (वय २२) नावाचा हा तरुण दरीत पडला. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रविवारपासून ही शोध मोहीम सुरू होती. नवी मुंबईहून १३ पर्यटकांचा ग्रुप सिद्धगड परिसरात फिरण्यासाठी आला होता. साईराज चव्हाण नावाचा तरुण दरीत पडून बेपत्ता झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि काही गिर्यारोहकांनी त्याचा शोध घेतला.
मुरबाडच्या सिद्धगड परिसरात सोमवारी सकाळी साईराजचा मृतदेह दरीत दिसला. पण पाऊस आणि धुके खूप होते. त्यामुळे मृतदेह बाहेर काढणे खूप कठीण झाले. अखेर मंगळवारी दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. साईराज धनंजय चव्हाण, वय २२ वर्षे, रा. नवी मुंबई, असे त्याचे नाव आहे. साईराजने अनेक ट्रेक केले होते, त्याचं इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न होतं मात्र त्याचं ते स्वप्न आता अधुरं राहिलं आहे.
मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी पर्यटकांना महत्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “पावसाळ्यात डोंगरवाटा निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये.” त्यांच्या या आवाहनातून पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी दिसून येते.
पावसाळ्यामध्ये आता अनेकजण ट्रेकिंगचा प्लॅन करतात परंतु पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग वाटते तितके सोपे नसते. कारण संपूर्ण ज्या पायवाटा असतात त्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे निसरड्या झालेल्या असतात. त्याच्यामुळे पाय सटकून दरीत पडण्याचा धोका असतो, त्यासोबतच इतर काहीतरी गंभीर इजा होण्याचीही शक्यता असते. त्याच्यामुळे ट्रेकिंगला जात असताना पावसाळ्यात ट्रेकिंग करताना अवघड ठिकाणी ट्रेकिंग करण्याचे नियोजन शक्यतो टाळावे. जेणेकरून जिवाला काही धोका निर्माण होत नाही.