भोर-महाड मार्गावरील वरंध घाट येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोकादायक परीस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासानाने अभिप्राय दिल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बंदीचा हा आदेश दिला.
मागील वर्षापासून राजेवाडी (रायगड जिल्हा) ते वरंध, भोर, पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत रस्त्याचे दुपरीकरण सुरू आहे. त्यामध्ये शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) ते महाडपर्यंतचा ८१.१६ किलोमीटरचा रस्ता दुपदरी होणार आहे. तेव्हापासून या घाटमार्गे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा बंद आहे, तर अवजड वाहतूकही बंद होती. दरम्यान, रस्त्याच्या कामाची परिस्थिती पाहून नियम धाब्यावर बसवून काही अवजड आणि इतर वाहने संधी मिळेल, तशी सुसाट जात होती. आता पावसाळा सुरू झाला आहे.
हवामान विभागाने या परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, नागमोडी वळणे, अतिउतार, घाटमाथा; तसेच जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संभावतो. यापूर्वी प्रत्येक पावसाळ्यात घाटामध्ये अनेकदा अचानक दरड कोसळणे, रस्ता खचणे, भराव वाहून जाणे आदींमुळे जिवीत व वित्तहानीच्या घटना झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तीन महीन्यांसाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बंडगार्डन पूल अचानक केला बंद
येरवडा: शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या बंडगार्डन पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने मंगळवारी दुपारी अचानक एक बाजू वाहतुकीसाठी बंद केल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पाऊण तासाने काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खुला झाल्याने वाहतूक पूर्ववत होऊ लागली. मात्र, महापालिकेने भरदिवसा किरकोळ दुरुस्तीसाठी काही काळ पूल बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पुणे शहर आणि पूर्व भागाला जोडणारा अशी बंडगार्डन पुलाची ओळख आहे. काही महिन्यांपूर्वी बंडगार्डन पुलावर खड्डा पडल्याने दोन दिवस पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवस पूर्व उपनगरात जड वाहने वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे नगर रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला होता.