ऐन नवरात्रीच्या तोंडावर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात एक नवा वाद सुरू झाला आहे. हा वाद अंबाबाईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे.
कोल्हापूर अंबाबाई मंदिराचा हा वाद तसा जुनाच आहे. पण या वादाला शारदीय नवरात्रोत्सवात तोंड फुटणार आहे. कारण श्रीपूजक अंबाबाईला महालक्ष्मी करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप भक्त करीत आहेत. त्यामुळेच अंबाबाईला मूळ ओळख परत मिळवून देण्याची चळवळ सुरु झाली आहे.
अंबाबाईवर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हा वाद जास्तच चिघळला. श्रीपूजकांनी अंबाबाईची मूळ ओळख पुसल्याचा दावा भक्त मंडळीनी केला आहे. डोक्यावरचा नाग आणि पायाजवळचा सिंह गायब करणं हा त्याचाच भाग असल्याचा दावा आहे.
अंबाबाई ही बालाजीची पत्नी असून, बालाजीच्या दर्शनानंतर तिचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, असा एक समज आहे. पण हे सारं काही मार्केटिंगसाठी असल्याचा दावाही भक्त करीत आहेत.
इतकंच नाही, तर मंदिरातल्या आर्थिक उलाढालीवरही या समितीनं आक्षेप घेतला आहे. विषय लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आहे. त्यात शारदीय नवरात्रोत्सव तोंडावर आहे. त्यामुळे या प्रकरणी श्रीपूजकांनी मौन न बाळगता समोर येऊन स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

