महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम लागणार, की कसे याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली असतानाच आता पुन्हा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे. आमच्यात कुठलेही मनभेद नाहीत. त्या-त्या वेळी राजकीय विचार वेगळे असू शकतात, पण आमची मनं 95 टक्के एक आहेत. राज साहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला, तेव्हा दोन्ही बाजूंनी पटापट प्रतिक्रिया आल्या. उद्धवजींनीही त्याच वेळी सांगितलं, की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईसाठी एकत्र येण्यास तयार आहोत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दोन्ही भाऊ नात्याने एक आहेत, ध्येय धोरणं सारखी आहेत, त्यामुळे एक होणं कार्यकर्ते आणि मतदारांनाही वाटतंय, त्यामुळे दोन्ही भावांनी लवकर विचार करावा, तू मी तू मी करताना ट्रेन सुटून जाईल, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.