वाद सोडवण्यासाठी केलेली मध्यस्थी जीवावर बेतली, घरगुती वादातून चुलत्याला संपवलं; पुण्यात खळबळ

पुण्यात हत्या, मारामारी, चोरीच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत. दररोज शहरात गुन्हेगारीच्या घटना समोर येत असून पोलिसांसमोर यावर अंकुश मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. अशीच एक हत्येची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) गावच्या पानसरे वस्ती येथे घरगुती वादातून धक्कादायक हत्येची घटना घडली आहे.

दशरथ गुलाब पानसरे याने आपला चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तुकारामने हल्ला परतवताना हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी तुकारामचे वडील दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पुतण्या दशरथने त्यांच्या छातीत लोखंडी रॉड भोसकून त्यांची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी चाकण पोलिसांनी दशरथ पानसरे याला अटक केली आहे. शुक्रवारी (६ जून २०२५) सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने तुकाराम पानसरे यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील बहुळ या गावात दशरथ पानसरे आणि तुकाराम पानसरे हे राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते. हाच वाद शुक्रवारी वाढत गेला, त्यावरून दशरथ आणि चुलत भाऊ तुकाराम यांच्यात वाद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *