राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. विदर्भातदेखील मान्सूनने धडक दिली आहे. राज्यात मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. मान्सूनच्या सुरुवातीचा मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतीशिवारातही पाणी शिरले होते. मान्सून तर आला पण पेरणी कधी करावी? अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबतच कृषीतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मे महिन्यातच सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे मशागत न करता ‘वाफसा’ आल्यानंतरच पेरणी करावी लागणार आहे. काळ्या, खोल जमिनीत पेरणीयोग्य वाफसा येण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. परंतु यापुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, मॉन्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी व बागायती पिकांचे झालेले नुकसान 23 मेपर्यंत 32 हजार हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. 25 मेनंतर झालेल्या मूळ मॉन्सूनच्या पावसामुळे राज्यातील खरीप पेरण्यांचे नियोजन विस्कळित झाले आहे. सध्या अतिपाऊस झालेल्या भागात वाफसा येण्यासाठी 8-10 दिवस वाट पाहावी लागेल. चालू आठवड्यात पाऊस कायम असल्यास शेतकऱ्यांना अंदाज घ्यावा लागणार आहे.
शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्यात?
राज्यात या वर्षी मान्सून साधारणतः 11 दिवस आधी दाखल झाला आहे. त्यामुळं शेतीच्या हंगामाला सुरुवात लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. काही भागांत पावसाचे प्रमाण अधिक असून जमिनी सतत ओलसर राहिल्यामुळं पेरणीसाठी योग्य वापसा अद्याप निर्माण झालेला नाही.
राज्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये, राज्यात साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा किंवा स्पेल संपेल त्यानंतरच म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवडच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरूवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्न डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कृषी विभागाने म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व होत असलेल्या पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे.. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असून या तालुक्यातील फळबागेचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील युवा शेतकरी धनंजय गर्जे यांनी दहा एकरवर आंब्याची बाग जोपासली होती. यासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसाने फळबागेचे मोठे नुकसान झालंय. बाजारपेठेत आंबा दाखल होण्यापूर्वीच सततच्या पावसाने आंब्याचे नुकसान होऊन फळ गळून पडले आहेत.