दिवसभरात सेवन करण्यात येणाऱ्या भाज, फळं, दूध तसंच इतर पदार्थांमध्ये शरीराला घातक ठरेल, इतक्या प्रमाणात कीटकनाशकं असल्याचं सरकारी तपासणीतच समोर आलं आहे. तपासणी झालेल्या 20,618 नमुन्यांपैकी 12.5 टक्के नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाण घातक पातळीवर असल्याची स्पष्ट झालं आहे.
भाज्यांच्या 1180, फळांच्या 225, मसाल्याच्या 732, तांदळाच्या 30, डाळीच्या 43 नमुने तपासणीसाठी मागवण्यात आले होते. त्यात या कीटकनाशकांचं प्रमाण घातक पातळीपर्यंत असल्याच उघड झालं आहे. भाज्यांमध्ये अॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लिझ ही कीटकनाशकं सापडली असून फळांमध्ये अॅसिफेट, अॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस इत्यादी कीटकनाशकं सापडली आहे.
इतकंच नाही तर बंदी असलेल्या अनेक कीटकनाशकांचाही वापर केल्याचं या तपासणीत उघड झालं आहे. तर कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, सुमारे 543 नमुन्यांमध्ये 2.6 टक्क्यांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कीटकनाशकं आढळले आहेत.
सरकारतर्फे 2005 पासून विविध खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होते. या तपासणीकरिता देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून भाज्या, फळं, कडधान्य, दूध तसंच इतर खाद्यपदार्थांचं नमुने गोळा केले जातात.

