मुंबईकरांना यापुढे काटकसरीनेच पाणी वापरावं लागणार आहे. कारण पुढच्या वर्षी मान्सून येईपर्यंत मुंबईतील 20 टक्के पाणी कपात कायम राहाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जाता जाता मान्सूनं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीमध्ये थोड्या फार प्रमाणात भर घातली होती. पण अजूनही तलावांमध्ये 80 दिवसांचा उणे पाणीसाठा आहे. त्यामुळे जोपर्यंत पुन्हा मान्सूनचा पाऊस सुरु होत नाही, तोपर्यंत 20 टक्के पाणीकपात कायम राहणार आहे.
याचाच अर्थ ऑक्टोबर महिन्यापासून किमान जुलै महिन्यापर्यंत मुंबईला पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, वैतरणा, भातसा या सर्व तलावांमध्ये मुंबईकरांची तहान भागवू शकेल इतका पाणीसाठा नाही.
त्यामुळे पुढच्या वर्षी मान्सूनच्या आगमनापर्यंत मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असा संदेश पालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

