जिंदाल कंपनीच्या वायुगळतीतील बाधित विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास; १९ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात हालविले

जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असताना त्यातील १९ विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. या विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी दुपारनंतर या वायुगळतीचा दोन प्रोढांनाही त्रास होऊ लागला असून त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जिंदाल कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर ७२ तासांनी या वायुगळतीचे वाईट परिणाम दिसू लागल्याने आता या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागले तर काहींच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. असा त्रास होणाऱ्या १९ विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७२ तासानंतर काही प्रौढांनाही त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *