बांगलादेश मधील हिंदू अत्याचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’कडून 25 रोजी सांगलीमध्ये कडकडीत बंदची हाक दिली आहे. शिवप्रतिष्ठाननेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी ही बंदची हाक दिली आहे. या बंदसाठी 20 ऑगस्ट रोजी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अती कडकडीत बंद पाळण्याचं आवाहनही संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच बांगलादेशमधल्या हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकारने कडक पावली उचलावीत अशी मागणी करत बांगलादेश बाबत सगळ्या पक्षांनी मतभेद बाजूला सारुन एक मताने उभे राहिले पाहिजे, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. मात्र एकहीजण मतभेद विसरुन उभे राहत नाही. हे देशाशाठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी खंत व्यक्त करत हसीना शेख यांच्या भारतातील आश्रयाचे भिडे गुरुजींनी स्वागत केले आहे.
भारत सरकारचा उल्लेख…
“पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बंगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदुस्थानकडे आश्रयाला आल्या, दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. हसीना शेख भारतात आल्या ते योग्य आहे,” असं संभाजी भिडे म्हणाले. एवढ्यावरच न थांबता भारत सरकारने पुढाकार घेऊन शेजारच्या देशात हिंदूंविरोधात चालेला अत्याचार थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असंही संभाजी भिडे म्हणाले. “बांगलादेशमध्ये चाललेला नंगा नाच बंद झाला पाहिजे. जसे बटन दाबल्यावर दिवा बंद होतो, तसं काम या समस्येबद्दल केलं पाहिजे,” असं संभाजी भिडे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “भारताच्या सरकारमध्ये तशी धमक असून तसं काम त्यांनी करावं,” असंही भिडे यांनी म्हटलं.
पेटून उठायला हवं
“बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतरण अजिबात करता कामा नये. त्यांना बांगलादेशमध्येच सुरक्षा मिळायली हवी. सर्व हिंदू राजकारणी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवेत,” असं संभाजी भिडे म्हणाले.
शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव
संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना कुशल, हिंमतवान, देशभक्त अशी विशेषणांचा वापर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केलं. भिडेंनी समस्याची पालवी महाराष्ट्रला फुटत आहे, समाजमनाचे मनोगत मांडताना शिवप्रतिष्ठान यामध्ये सहभागी आहे असं म्हटलं. या हिंदुस्थानचा जनप्रवाह घेऊन महाराष्ट्रचा जीवनगडा मुख्यमंत्री शिंदे हाकत आहेत. कुशल, हिंमतवान, देशभक्त, लोकहीतासाठी झटणारा नेता महाराष्ट्रचा संसार हाकत आहे,” असं भिडे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबद्दलही बोलले
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी चांगली असली तरी यामध्ये महिलांना मानधन देऊन नव्हे त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही याचीही व्यवस्था राज्य सरकारने करावी असे भिडे यांनी म्हटलं आहे.
