कोकणात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगले वातावरण नसल्याचे चित्र दिसून आलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रविंद्र चव्हाण यांची तक्रार करणारे पत्र पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे. यावर आता रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट
राष्ट्रीय महामार्ग हे खातं नितीन गडकरी यांचे आहे. कोकणचा सुपुत्र म्हणून यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न मी करतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्या मतदार संघात ह सरकारच्या माध्यमातून मी हजारो कोटींचा निधी त्यांच्या मतदारसंघात दिलाय. यासाठी त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढच सांगेन, मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला तयार आहे. भाजप म्हणून मी सौजन्याने वागतोय.
उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या
उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री होते. कधी कोणतं काम केलं? 35-40 वर्षात काय काम केलं? त्यांनी एक काम केलेलं दाखवाव. उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या करतात. उद्धव ठाकरे त्यांना उगीच महत्व देत होते. आता ते चालणार नाही, असा पलटवार रवींद्र चव्हाणांनी केला. सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून मी काम केलंय. युतीधर्म पाळण्याचा अधिकार फक्त एकट्या रविंद्र चव्हाणांच नाही. युतीधर्म त्यांनी देखील पाळायला हवे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
काय म्हणाले रामदास कदम?
कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय.. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली. तर दापोलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहकार्य करत नासल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी फडणवीसांकडं तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलंय.कोकणातील रस्त्यांवरून रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय.. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाहीय. चाकरमान्यांचे हाल होतायत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. रविंद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. अशी टीका रामदास कदमांनी केली. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून माझी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांना मी हे पत्र देईन. ते काय कार्यवाही करतात ते पाहीन. 2019 मध्ये युती असताना दापोलीच्या भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला मतदान केलं नाही. ही बाब मी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिली. पण यात काही फारसा बदल झालेला दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गामुळे आमचे हाल होतायत. आम्ही काय पाप केलंय? 14 वर्षे का लागतात? याचं उत्तर आम्हाला कोण देईल? आमच्या व्यथा आम्ही कुठे मांडायच्या? रविंद्र चव्हाण हा माणूस युती कशी तुटेल हे पाहतोय. आमच्या जिल्ह्यात येतात पण शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही, असे रामदास कदम म्हणाले.
