“या” जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात आज सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे विदर्भात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यातील रस्ते बंद झाले असून शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने कोकण आणि विदर्भाला अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणासह विदर्भात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा-कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत आज सकाळीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

कोकण आणि विदर्भात आजही पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील आज बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहरासह उपनगरांमध्येही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भापासून कोकणापर्यंत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. येत्या काळात हा कमी दाबाचा पट्टा निवळणार असून, पावसाचा जोरही कमी होताना दिसणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना इशारा

विदर्भातील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, ठाणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *