दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रॅन्ट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या चारही महिला असून त्यापैकी एक महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चारही महिलांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध परिमंडळ २ तर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डी. बी. मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. माजिदा गुलाम जिक्रिया शेख आणि नूरजहाँबेगम सुल्तान मुल्ला अशी या दोघींची नावे आहेत. यातील नूरजहाँ गेल्या सात वर्षांपूर्वी भारतात बेकायदेशिररित्या दाखल झाली होती. एका दलालाला पैसे देऊन ती बांगलादेशमधून नौकेतून कोलकाताला आली होती. त्यानतंर तेथून ती रेल्वेने मुंबईत दाखल झाली होते. गेल्या सात वर्षांपासून ती मुंबईत वास्तव्यास होती. माजिदा ही गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असून तिला एका बांगलादेशी मित्राने भारतात पाठविले होते. त्यासाठी तिने मित्राला काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. गेल्या काही वर्षांपासून ती गिरगाव परिसरात राहत होती. परिसरात छोटी-मोठी कामे करून ती उदरनिर्वाह चालवत होती.
