दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाण्यावर आपलं उखळ पांढरं करणाऱ्या साखर कारखानदारांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं मोठा दणका दिला आहे. उजनीचं पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा प्राधिकरणानं दिला आहे.
पालिका आयुक्त तुकारम मुंडे हे या निर्णयाच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. यामुळे साखर कारखानदार चांगलेच धास्तावले असून ते हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. उसासाठी धरणातून पाणी सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी याचिका केली होती त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे.
उजनी धरण हे आठमाही असून इथून पुढे धरणात अतिरिक्त पाणी असेल तरच बारमाही पाणी सोडता येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, आमदार भारत भालकेंनी पिण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र पाणी अपुरं असल्याचं सांगत प्राधिकरणानं ही सुद्धा मागणी फेटाळून लावली.

