अंबरनाथमध्ये आईच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मुलीवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जुलैला रात्री रीटा प्रसाद आणि त्यांची मुलगी प्रीती या दोघी दुचाकीवरुन आपल्या घरी चालल्या होत्या. त्यावेळी कल्याण-कर्जत महामार्गावर दुचाकी खड्ड्यात स्लीप झाल्यानं अपघात झाला.
या अपघातात रीटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि पाच दिवस कोमात असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघाती मृत्यूप्रकरणी प्रीतीच्याच विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळं या अपघाताप्रकरणी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंबरनाथ सिटीजण फोरमनं केली आहे.
कल्याण-कर्जत महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या अपघाताप्रकरणी आता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर आईच्या मृत्युच्या धक्क्यातून कशीबशी सावरलेली प्रीती ही आपल्यावरच गुन्हा दाखल झाल्याने मानसिक तणावखाली आहे.

