हेल्मेट न घालून जोखीम पत्करली; अंधेरीस्थित दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या भरपाईत ३० टक्के कपात

हेल्मेट न घालून निष्काळीपणा केल्याच्या कारणास्तव अंधेरीस्थित अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना मंजूर केलेल्या एकूण नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने कमी केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराची पत्नी, मुलगा आणि आईला एकूण १.४६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार होती. त्याऐवजी त्यांना आता १.०२ कोटी नुकसानभरपाई मिळणार आहे.

पवई येथून २०१४ मध्ये जात असताना एका ट्रकने सत्यप्रकाश सिंह यांच्या दुचाकीस्वाराला धडक दिली होती आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. निष्काळजीपणामुळे ट्रक चालवल्याने अपघात झाला हे न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईचा दावा मंजूर करताना मान्य केले. मात्र, दुचाकीस्वारानेही वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नसल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले. घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे लक्षात घेता त्यात हेल्मेट नसल्याचे दिसून आले. शिवाय, पंच साक्षीदारालाही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याचे आढळून आले नाही. यावरून दुचाकीस्वारानेही वाहतूक नियमांचे पालन केले नसल्याचे आणि हेल्मेट न वापरता जोखीम पत्करल्याचे स्पष्ट होते. परिणामी, सिंह हेही अपघातातील दुखापतीसाठी जबाबदार होते, असे न्यायाधिकरणाने नमूद केले. तसेच, याच कारणास्तव सिंह यांच्या कुटुंबीयांना मंजूर केलेल्या एकूण नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम कमी करण्यात आल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.

न्यायाधिकरणाने सिंह कुटुंबीयांना व्याजाशिवाय ९५.२३ लाख रुपये एवढी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मंजूर केली होती. सिंह यांच्या अपघाती मृत्युमुळे झालेले भविष्यातील उत्पन्नाचे नुकसान, पती गमावल्याने पत्नीचे, पित्याचे छत्र गमावल्याने मुलाचे आणि मुलगा गमावल्याने आईचे झालेले वैयक्तिक नुकसान या बाबी न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करताना प्रामुख्याने विचारात घेतल्या. याशिवाय, संपत्तीच्या नुकसानासह अंत्यसंस्काराचा खर्च देखील न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईच्या रकमेत समाविष्ट केला. आरोपीमुळे अपघात झाला असला तरी दुचाकीस्वाराचा हेल्मेट न वापरण्याचा निष्काळजीपणाही त्याच्या मृत्यूस कारणीभूत होता. त्यामुळे, नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम कपात केल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले.

न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार, सिंग यांची पत्नी कोमल हिला (३८) ७० टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे, तर उर्वरित रक्कम त्यांची आई सुरजादेवी (७३) आणि मुले कुसुम सिंग (१८) आणि इशान (१४) यांच्यात समान प्रमाणात विभागली जाणार आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी, सिंह यांच्या कुटुंबाने ट्रक मालक एसआर मेटल वर्क्स आणि विमा कंपनी द न्यू इंडिया ॲश्युरन्स विरुद्ध न्यायाधिकरणात धाव घेतली होती. सिंह हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता आणि त्याला प्रतिमहिना ५० हजार रुपये वेतने होते, असा दावा करून सिंह यांच्या कुटुंबीयांनी एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. दुसरीकडे, सिंह यांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे तेही अपघाताला जबाबदार होते. शिवाय, ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नसल्यामुळे वाहन मालकाने विमा योजनेच्या अटींचा भंग केल्याचा दावा विमा कंपनीने केला होता. तसेच, सिंह यांच्या कुटुंबीयांनी केलेला नुकसानभरपाईचा दावा फेटाळण्याची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *