मुंबईत गटारांवरील ४०० झाकणं गायब, भंगार विक्रेत्यांना पालिकेची तंबी

मुंबईतील रस्त्यांवरील उघड्या गटारांवर असलेली तब्बल ४०० झाकणं चोरीला गेली आहेत. जानेवारी ते जुलै महिन्यातील ही आकडेवारी असून मुंबई महापालिकेनेच ही माहिती दिली आहे. म्हणजे, दर महिन्याला सरासरी ५७ गटाराची झाकणे मुंबईत चोरीला जातात. याप्रकरणी मुंबई पालिकेने ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पावसाळ्यात रस्त्यावरील उघड्या गटारांवर झाकणे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गटारे उघडी राहिल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून जाताना गटारांचा अंदाज न आल्यास त्यात पाय अडकून पादचाऱ्यांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या गटारांवर झाकणे लावली जातात. ज्या ठिकाणी झाकणे नसतात तिथे सूचना म्हणून मोठी उभी काठी लावलेली असते.

गेल्यावर्षी सर्वाधिक चोरी

परंतु, ज्या ठिकाणी ही झाकणं लावली जातात ती चोरीला जात असल्याचं निर्दशनास आलं आहे. या झाकणांची बाजारात किंमत तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ झाकणं चोरीला गेली होती. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही पालिकेने म्हटलं आहे.

भंगार विक्रेत्यांना तंबी

झाकणं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर पालिकेने जून महिन्यांत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच, ही झाकणं खरेदी करणाऱ्या भंगारविक्रेत्यांनाही इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *