वरळीमध्ये कोयत्याने हल्ला करून एकाची हत्या

वरळीमध्ये मित्राने ३७ वर्षीय व्यक्तीची कोयत्याने हल्ला करून हत्या केली. आरोपी व मृत व्यक्ती लहानपणापासून मित्र होते. गेल्या तीन वर्षांपासून मृत व्यक्ती आरोपीच्या घरीच राहत होता. मृत व्यक्तीचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने त्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपीला वरळी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरिज जाधव (३६) आणि अशोक साळुंके लहानपणापासून मित्र होते. हे दोघे वरळी परिसरातील सिद्धार्थ नगरमध्ये वास्तव्याला होते. अशोक सफाई कामगार होता आणि तो गिरिजचा मेहुणा होता. गेल्या तीन वर्षांपासून अशोक गिरिजच्या घरीच राहात होता. पत्नीचे अशोकसोबत प्रेमसंबंध असल्याचा गिरिजला संशय होता. त्यामुळे तो अशोकच्या मागावर असायचा.

मंगळवारी बीडीडी चाळ क्रमांक ५ लगतच्या पदपथावर गिरिजने अशोकला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात अशोकच्या डोक्यावर आणि खांद्यावर गंभीर जखमा झाल्या. अशोकला तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिरिजविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून वरळी पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *