राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन, राजकारण, समाजकारण, चित्रपट क्षेत्रातून मदतीचे हात पुढे येत असताना क्रिकेट क्षेत्रही यात मागे नाही.
मुंबई क्रिकेट असोशिएशनने दुष्काळग्रस्तांना एक कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याच जाहीर केल्यानंतर मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
सोमवारी सकाळी अजिंक्यने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. शांत, संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्यच्या या कृतीतून त्याची सामाजिक जागृती, बांधिलकी दिसून आली आहे.
अपु-या पावसामुळे मराठवाडयासह राज्यातील काही भागांमध्ये सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक-पाणी नसल्यामुळे शेतक-याचे हाल होत आहेत. जनावरांना तीच स्थिती आहे.
अभिनेते नाना पाटकेर, मकरंग अनासपुरे हे मराठी कलाकार राज्यातल्या ग्रामीण भागांमध्ये फिरुन हतबल झालेल्या शेतक-याला आपल्या परीने आर्थिक मदतीचा हात देत आहेत. अजिंक्यची ही आदर्श कृती निश्चितच अन्यांना प्रेरणा देऊन जाणारी आहे.

