अधिक मासात मनासारखा मानपान न केल्यामुळे नवविवाहितेला पेटवून देण्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे बुधवारी घडली. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अक्षदा जाधव असे मृत्यूमुखी पडलेल्या 21 वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. तिची आई शारदा मुंगसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती अनिल जाधव आणि नणंद शुभांगी यांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
खेड तालुक्यातील रासे भोसे येथे राहणाऱ्या अंकुश मुंगसे यांची मुलगी अक्षदा हिचे अनिल याच्याबरोबर चार महिन्यांपूर्वी आळंदी येथे लग्न झाले होते. अधिक मासानिमित्त दोघेही अक्षदाच्या माहेरी रासे-भोसे येथे गेले होते. त्यावेळी अंगठी आणि घड्याळ न दिल्याने त्याचा राग मनात धरुन अनिल आणि नणंद शुभांगी यांनी बुधवारी सायंकाळी अक्षदाला मारहाण केली. त्यानंतर घरातील बाथरुमजवळ तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात गंभीर भाजल्यामुळे अक्षदाचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तिच्या मृत्यूप्रकरणी पती अनिल आणि नणंद शुभांगी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

