पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. आज पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी नव्हती. त्यातच गणेशोत्सवाला अजून 10 ते 12 दिवस असल्याने गर्दी नसल्याचे हे एक कारण आहे. विशेष म्हणजे या गाडीने प्रवास करण्याचा खर्च अवघा 50 रूपये येणार आहे. 4 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात ही विशेष गाडी धावणार आहे. पनवेलवरून रोज सकाळी 11 वाजन 10 मिनिटाने ही गाडी चिपळूणसाठी रवाना होणार आहे.
गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची कायम गर्दी पहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सवात विशेष गाड्यांची मागणी दरवर्षीच होत असते. मात्र यावर्षी कोकणात गणपतीसाठी जाणार्यांसाठी पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी सुरू करण्यात आलीये. आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत या काळात ही विशेष गाडी धावणार आहे.
दुपारी 4 वाजता चिपळूणला पोहचल्यानंतर हीच गाडी परतीचा प्रवास चिपळूणवरून 5.30 ला पनवेलच्या दिशेने करणार आहे. एकूण 15 रेल्वे स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. यामध्ये पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, मानगांव, गोरेगांव रोड, विर, सापे वामने, करंणजाडी, विनहिरे, दिवानखवटी, खेड, अंजनी, चिपळूण यांचा समावेश आहे. ही बारा डब्यांची गाडी असून यात एक डबा एस्सी कोच देण्यात आला आहे. ज्याचे तिकीट चिपळूण पर्यंत 395 रूपये आहे. दरम्यान सुरू करण्यात आलेली विशेष रेल्वे गाडी ही कायमस्वरूपी करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

