एसटी संपाबाबत मोठी बातमी, ‘२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा’

एसटी संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी. 22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, संपकरी यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाची दिशाभूल करु नये, असे सांगत न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले. जे संपकरी कर्मचारी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांना त्यांच्याविरोधात बडतर्फी, निलंबन किंवा अन्य कारवाई सुरू असली तरी ती मागे घेऊन समज देऊन कामावर घेऊ, अशी माहिती एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात दिली.

निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ

ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटल्यात जमा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा असे होणार नाही, अशी समज देऊन सेवेत सामावून घ्यावे, असे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. मोठी बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, 15 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार आहोत, असे राज्य सरकारने न्यायालयात माहिती दिली.  FIR मागे घेऊ शकत नाही, असेही राज्य सरकारने यावेळी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल, मात्र प्रक्रियेद्वारे, म्हणजे कर्मचाऱ्यांनी अपील करून घेतले जाईल. पुन्हा अशी वर्तवणूक  करु नये, अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्या, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  22 एप्रिलपर्यंत जे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना कामावर येण्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *